। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील वाढत्या औद्योगिकरणाचा परीणाम माणगाव शहरात जाणवू लागला असून शहरीकरणा बरोबरच नागरिकीकरणही झपाट्याने वाढत आहे. माणगाव शहराच्या चारही आजूबाजूनी नद्या असून त्या नदीत पुरेसे पाणी असते. त्यामुळे माणगाव शहर हे नद्यांच्या बेटावर असून या शहराला मुबलक पाणीपुरवठा होणे काळाची गरज आहे. मात्र माणगाव ग्रामपंचायतीच्या काळातील पाणी योजना 40 वर्षानंतरही कायम राहिली आहे. याचा विचार करून माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव व जुन्या पाणी योजनेतून स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असून लवकरच ही वाढीव पाणी योजना कार्यान्वित होवून दरदिवशी 135 लीटर प्रतीमाणसी पाणी नागरिकांना मिळणार आहे.
यासाठी वाढीव पाणी योजनेची नागरिकांना आणखी कांही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 3 पाणी टाक्या उभारून वाढीव पाणी योजनेसाठी 35 लक्ष लिटर्स प्रतीदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. शहराची सन 2011 चे जनगणनेनुसार लोकसंख्या 18740 इतकी होती. यात वाढ होवून सुमारे 25 हजार लोकसंख्या आहे. पुढील 20 वर्षाचा विचार करून ही नवीन वाढीव पाणी योजना कार्यान्वित केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाही.
नवीन पाणी पुरवठा योजना ही अमृत 2.0 अंतर्गत उभारली जाणार आहे. यात 3 पाण्याच्या स्वतंत्र टाक्या उभारण्यात येणार असून माणगाव शहराच्या पश्चिम भागात जुने माणगाव, खांदाड व नाणोरेचा कांही हिस्सा याकरिता 30 लक्ष प्रतीदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावीत आहे. जुने जलशुद्धीकरण व नवीन जलशुद्धीकरण यामधून प्रतीदिन 65 लक्ष लिटर पाणी दरदिवशी मिळणार आहे. त्यामुळे नगरपंचायत हद्दीतील सर्वात शेवटच्या घरापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. तर शहरी भागाकरिता 135 लिटर प्रती माणसी पाणीपुरवठा होणार आहे. पूर्व भागातील उतेखोल गाव, भागाव व नाणोरे हा भाग जुन्या पाणी योजनेद्वारे वितरीत होणार आहे.