आपटा ग्रामस्थांची मागणी
| आपटा | वार्ताहर |
मुंबई-गोवा महार्गावरील टोलनाका खारपाडा पुलावर उभारण्यात येत असून, काही दिवसातच याठिकाणी टोलवसुली करण्यात येणार आहे. याठिकाणी आपटा ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारचा टोल घेण्यात येऊ नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, पेण व अलिबाग येथे जाताना आपटा ग्रामस्थांना टोल फ्री केला पाहिजे. कारण, नियमानुसार नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील ग्रामस्थांना टोल फ्री असतो. म्हणून आपटा ग्रामस्थ जेव्हा जेव्हा पेण व अलिबाग येथे जातील, तेव्हा त्यांना टोल माफ करावा, अशी मागणी ग्रामस्थ व आपटा ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.
कारण, येथील ग्रामस्थांना नेहमीच भाजीपाला, किराणा खरेदी व जिल्ह्यातील कामासाठी अलिबाग येथे जावे लागते. जर टोलवसूल केला, तर नाहक आर्थिक भुर्दंड पडणार आहे. तरी, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची सविस्तर माहिती टोल अधिकारी यांना द्यावी, जेणेकरुन पुढील काळात अडचणी निर्माण होणार नाहीत, अशी विनंती आपटा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.