महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अरुंद रस्ते 2017 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी नेरळमधील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना नेरळ गावातील सर्व रस्त्यांवर असलेले विजेचे खांब आजही कायम आहेत. दरम्यान, ते विजेचे खांब रस्त्याच्या मधून काढून ते बाजूला घेण्यासाठी एमएमआरडीएकडून निधीची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत महावितरण कंपनीकडून रस्त्यावरील विजेचे खांब काढले गेले नाहीत आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळे आणत असून, ते धोकादायक स्थितीत असल्याने सर्व विजेचे खांब महावितरण कडून तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्मण सेनेने केली आहे.
नेरळ गावातील रस्त्यांचे रुंदीकरण करून त्या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून 22 कोटींच्या निधीमधून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. ज्यावेळी नेरळ गावातील रस्ते अरुंद होते, त्यावेळी त्या रस्त्यांच्या कडेला असलेले विजेचे खांब हे रस्ता अरुंद झाल्यानंतर विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले आहेत. ते विजेचे खांब काढून बाजूला घेण्यासाठी किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी निधी मंजूर करून हा निधी महावितरण कंपनीकडे देण्याची मागणी त्यावेळपासून केली जात होती. ती मागणी मागील पाच वर्षांत पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे नेरळ गावातील रस्त्यांवर असलेले विजेचे खांब वाहनचालकांना बाजूला काढण्याची कार्यवाही महावितरण कंपनीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेले वीज वाहक खांब महावितरण कंपनीने बाजूला करावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
याबाबत मनसेचे नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण यांनी महावितरण कंपनीकडे काँक्रिटकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर उभे असलेले विजेचे खांब बाजूला करण्याची मागणी केली आहे. तर, महावितरण कंपनी त्या विजेच्या खांबांना शिफ्ट करण्यासाठी आवश्यक असलेला निधी आम्हाला प्राप्त झाला नाही असे सांगत आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने निधी देण्यासाठी दाखवलेली तयारी कधी पूर्ण होणार आणि नेरळ गावातील रस्त्यांवर मधोमध उभे असललेले विजेचे खांब हलविण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.