तालुक्यातील शेतकरी हवालदिल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्व भागात भातशेती पिकांनी बहरली आहेत. मात्र, त्या पिकाचे सध्या सुरु असललेला सरता पाऊस नुकसान करीत आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. असे असताना रानडुकरांकडून भातशेतीची नासाडी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाणार काय, अशी भीती शेतकर्याला सतावत आहे. कर्जत तालुक्यातील वदप, कुशिवली हा परिसर डोंगराच्या कडेने लागलेला भाग असून, या भागातील शेतकर्यांच्या शेतात भाताचे चांगले पीक आले आहे. त्यामुळे शेतकरी खुश आहे. मात्र, सरता पाऊस आणि त्यासोबत रानडुकरांचा प्रादुर्भाव शेतकर्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. रानडुकरे ही शेतात घुसून भातपिकाचे नुकसान करीत आहेत.
वदप, कुशिवली आणि दहिगाव भागात रानडुकरांचा हैदोस सुरु असून, कळपाने येणार्या रानडुकरांमुळे भातपीक अस्ताव्यस्तपणे कोसळून जात आहे. आधीच अवकाळी पाऊस त्यातच हातातोंडाशी आलेला घास डुकरांमुळे निघून जाण्याची वेळ शेतकर्यांवर आलेली आहे. रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने पिकांना त्याचबरोबर जीवितालाही धोका होत आहे. वन विभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. तसे निवेदन तहसीलदार आणि वन अधिकारी यांना स्थानिक शेतकरी देणार आहेत. दरवर्षी रानडुकरांमुळे शेतीची नासाडी होत असून, यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
तहसील कार्यालय आणि वन विभाग यांनी सततचा निर्माण होणार प्रश्न समजून घेऊन भाताची पिकाची नासाडी थांबविली पाहिजे. त्यातही आमच्या विभागाकडून पत्रव्यवहार यापूर्वी करण्यात आला असून, पुन्हा एकदा कळविले जाईल. आम्ही भाताचे प्रयोग शेतीत करीत असतो आणि त्यावेळी रानडुकरे त्या शेतात घुसून सर्व मेहनत फुकट घालवतात, तसेच शेतकर्यांचे आणि कृषी विभागाचे नुकसान करतात.
– अजित पाटील, समन्वयक, तालुका कृषी अधिकारी