राजशिष्टाचार विभागाकडून जिल्हाधिकार्यांना पत्र
शासकीय-निमशासकीय जागेचा दिला पर्याय
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्या मागणीची दखल
खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिले होते मुख्यमंत्र्यांना पत्र
पनवेल | वार्ताहर |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची ही घटना तयार केली. यातून प्रत्येक भारतीयाला मूलभूत अधिकार आणि हक्क मिळाले. याची माहिती पुढील पिढीलाही व्हावी असे त्याचे महत्त्व समजावे यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारण्यात यावा, अशा प्रकारची मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने पत्र देऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय-निमशासकीय जागेवर हे स्तंभ उभारण्यात यावे, असेही सूचित केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते.
भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारताच्या संविधानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सविधानाप्रती अभिमान आणि आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय संविधान नवीन पिढीला माहिती व्हावी. त्याची ओळख व्हावी आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हाव, एकात्मता बंधुभाव आणि समानतेचे मूल्य तरुण पिढीमध्ये रुजावेत यासाठी राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान स्तंभ उभारण्यात यावेत, अशी मागणी कामोठे येथील सचिन गायकवाड यांनी केली होती. त्यांनी यासंदर्भात राज्याच्या राजशिष्टाचार विभागाकडे पाठपुरावासुद्धा केला. त्यानुसार या विभागाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून शासकीय-निमशासकीय जागेवर अशा प्रकारचे संविधान स्तंभ उभारण्याबाबत सूचित केले आहे. यासाठी आवश्यक असणार्या राजमुद्राचा वापर करण्यासाठी केंद्रीय गृह विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नियम आणि कायद्याचे अवलोकन करून कार्यवाही करावी, असे सूचित करण्यात आले आहे.