शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी;पोलिसांवरही दबावाचे आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
‘शेतकरी जगला पाहिजे’ अशा घोषणा देणाऱ्या महायुती सरकारमधीलच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. रोहा तालुक्यातील महादेवखार गावात किरकोळ कारणावरून एका शेतकऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची वाढती दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आता शेतकरीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र समोर येत आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव अनिल नारायण मोरे असे असून, ते महादेवखार येथील रहिवासी आहेत. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतालगत कांबळे कुटुंबाचीही जमीन आहे. या परिसरात काही मंडळींकडून साकव बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, या साकवामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी थेट त्यांच्या शेतात शिरून शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती मोरे यांनी व्यक्त केली होती.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जाऊन वस्तुस्थिती मांडली होती. साकव उभारण्यापूर्वी शेताच्या संरक्षणासाठी भिंत बांधणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली होती. नदीच्या दुसऱ्या बाजूलाही संरक्षण भिंत उभारली नाही तर शेतजमिनींचे मोठे नुकसान होऊ शकते, असे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
दरम्यान, गुरुवारी (दि.21) दुपारी अनिल मोरे हे आपल्या घरी जात असताना गावातील तुकाराम बाळू कांबळे आणि अस्मिता हरेश मांदाडकर यांनी त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी मिळून मोरे यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी मंगेश कांबळे हेदेखील घटनास्थळी आले आणि त्यांनीही शिवीगाळ करत “तक्रार केली तर घरी येऊन मारून टाकू,” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अनिल मोरे यांनी तात्काळ रोहा पोलीस ठाणे गाठून संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, या प्रकरणात राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोपही पुढे येत आहेत.
आमदारांच्या फोननंतर आरोपीचे नाव गायब?
शेतकरी अनिल मोरे मारहाणीची तक्रार नोंदवित असताना मंगेश कांबळे हे थेट पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना “आमदारांशी बोला” असे सांगत मोबाईल फोन दिला. त्यानंतर पोलिसांचे आणि संबंधित आमदारांचे मोबाईलवर संभाषण झाले. मात्र, त्यानंतर तिसरा आरोपी असलेल्या मंगेश कांबळे याचे नाव तक्रारीत घेण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. आमदारांच्या फोननंतर आरोपीचे नाव तक्रार नोंदवहीतून वगळण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून, त्यामुळे पोलिसांच्या निष्पक्ष कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठीही राजकीय दबाव सहन करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







