एमएसआरडीसी, एमएसआयडीसी विरोधात संताप
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग-चौल मार्गावरील रुंदीकरणाच्या कामामुळे सध्या संपूर्ण परिसर धुळीच्या प्रचंड विळख्यात सापडला असून, ठेकेदार असलेली आर.पी.पी. कंपनी आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. एमएसआरडीसी आणि एमएसआयडीसीच्या या प्रकल्पातील ढिसाळ नियोजन आणि संथ गतीमुळे प्रवासी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांचे हाल होत आहेत. नियमित पाण्याची फवारणी न केल्याने धुरळा नियंत्रणाबाहेर गेला असून, आरोग्य धोक्यात आले आहे.
दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. सर्दी, खोकला, कफ, श्वसनाचे त्रास आणि डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. कच्च्या रस्त्यांवर माती आणि खडी टाकल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. हा विकास नव्हे, तर आमच्या आरोग्यावरचा थेट हल्ला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी रस्ते खोदून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, धुळीच्या ढगांमुळे समोरचे दिसेनासे होत आहे. परिणामी, छोटे-मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. काही अपघातांत जीवितहानी झाल्याचीही चर्चा आहे, मात्र प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
चौल, मुखरी गणपती, बागमळा, सागमळा या भागांमध्ये अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेतच पडून आहेत. पावसाळा तोंडावर असताना ही कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात गावांमध्ये, गल्लीबोळात पाणी शिरण्याचा आणि मोठ्या प्रमाणात जीवित-वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाळी पर्यटन हंगामात अलिबाग-नागाव-रेवदंडा-मुरूड मार्गावर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटक हैराण झाले आहेत. याचा थेट फटका स्थानिक पर्यटन व्यवसायाला बसत असून, व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास चिखल, पाणी साचणे आणि अपघातांचा धोका प्रचंड वाढणार आहे. “होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल करत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे.
काम नाही, फक्त आश्वासने
एमएसआरडीसीचे वरिष्ठ अभियंता बी.के. सिंग यांनी आर.पी.पी. कंपनीच्या इन्चार्ज मारी यांच्याशी संपर्क साधून कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता, “पंधरा दिवसांत काम पूर्ण होईल,” असे आश्वासन देण्यात आले. मात्र, असे आश्वासन यापूर्वीही वारंवार देण्यात आले असून, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
कामांचा निकृष्ट दर्जा
काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याची चर्चा असून, अशी कामे दोन वर्षेही टिकणार नाहीत, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही दर्जाहीन रस्ते तयार होत असल्याने संताप वाढला आहे. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “दररोज किमान दोन-तीन वेळा पाण्याची फवारणी करा, धुळीवर कायमस्वरूपी उपाययोजना करा आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभी करा.” मात्र, प्रशासन आणि ठेकेदार यांचे दुर्लक्ष कायम असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.







