केगावमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल

पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची वाणवा असून सदर ग्रामपंचायत तर्फे 15 ते 20 दिवसांनी तेही एकदाच पाणी सोडले जाते. पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. पिण्याच्या पाण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नाही. कोणत्याही वेळेत पाणी सोडले जाते. शिवाय पिण्याचे पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्या ऐवजी तात्पुरते रबर पॅच बांधले जाते. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्याद्वारे, नाल्याद्वारे वाया जात आहे.
केगाव ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना 15 ते 20 दिवसांनी एकदा पाणी येते आणि त्यातच ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वॉल्व उघडे असते. या वॉल्वर कुत्रे, मांजरे, बेडूक, साप आदी विषारी जंगली प्राणी तिथे येऊन आपली विष्टा टाकतात आणि तेच पाणी नागरिकांना पिण्याचे पाणी म्हणून सोडले जाते. यातून नागरिकांना विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे.
पिण्याचे पाणी सोडण्यासाठी, नळ सोडण्यासाठी तसेच वॉल्व फिरविण्यासाठी अनुभवी, तज्ञ व्यक्तीद्वारे पाणी न सोडता मिळेल त्या व्यक्तीला नळाचे काम करण्यास सांगितले जाते. याबाबतीत कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. नागरिकांनी स्थानिक ग्रामस्थांनी विविध समस्ये संदर्भात ग्रामपंचायतला कळवून सुद्धा अनेकदा निदर्शनास आणून सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या विविध समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असा आरोप गावातील ग्रामस्थ अक्षय पाटील, आतिष हुजरे, प्रवीण पाटील, मृणाल पाटील, प्रेरणा पाटील, विनोद पाटील आदींनी केला आहे.

Exit mobile version