अभियंत्यांना ग्रामीण मार्ग सापडेना अखेर ग्रामस्थांनी दाखविला त्यांच्या वहिवाटीचा मार्ग
खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील आदिवासी बांधवां ना रहदारीसाठी मार्ग उपलब्ध नसतानाही रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वरिष्ठांकडे चुकीचे माहिती देत ग्रामीण मार्ग क्रमांक 132 करमळी ठाकुरवाडी आणि खडई धनगरवाडा या गावांसाठी जोड रस्ता असल्याचे कळविले होते.
परंतु ह्या वाड्यांना जोडणारा मार्ग प्रत्यक्षात उपलब्धच नसल्याने येथील आदिवासी आणि धनगर समाज बांधवांनी 6 ऑक्टोबरला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेवर मोर्चा नेला होता या मोर्चा दरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांचा रस्ता शोधून द्या अन्यथा दहा नोव्हेंबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिल्या नंतर आपल्या कार्यालयातून बाहेर न पडणारे खालापूर उप अभियंता गोपणे खालापूर प.स.शाखा अभियंता नागेश टाकणे यांच्यासह खालापूर प.स.चे गटविकास अधिकारी शुक्रवारी करंबेळी ठाकुरवाडीच्या रस्त्याच्या शोधात तब्बल पाच किलोमीटर दगडगोटे तुडवीत पायवटेतून मार्ग काढीत पोहोचले मात्र अभियंत्यांनी सुचविलेल्या रस्ता अस्तित्वातच नसल्याने व नसलेल्या रस्त्याची लांबी 6.4 किलोमीटर सांगितल्यानंतर अखेर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी अभियंत्यांची पोलखोल केली.
दोन्ही गावाच्या वहिवाटीचा रस्ता उजलोली ते करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा असा आहे असे सांगत या रस्त्याची लांबी अवघी साडेचार किलोमीटर असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया करण्याचीही गरज नाही या रस्त्यात साठी लागणारी जमीन शेतकरी स्वखुशीने देण्यास तयार असल्याचे सांगत अंतर मापक यंत्राने मोजणी करून संबंधित क्षेत्र कोणाचे आहे याचे निश्चितीकरण करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार नवीन रस्त्याची अलायमेंट करण्यात येईल असे शाखा अभियंता टाकळी यांनी सांगितले यावेळी अधिकाऱ्यांसोबत ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,अंकुश माडे, संतोष घाटे, नथु ढेबे, झिमा होगाडे, एकनाथ घाटे, भागू ढेबे महादू घाटे, देवराम घाटे, आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.