सरकारने सुरक्षा वाढवली, एसआरपीएफची तुकडी करणार कबरीचे संरक्षण
। छ. संभाजीनगर । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापले आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. त्या ठिकाणी आता एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे. त्यात 15 पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहे. मिलिंद एकबोटे यांना 5 एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येण्यास बंदी करण्यात आली आहे.
बजरंग दलाचे औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन
औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेब याची कबर हटवली नाही तर पूर्ण महारष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे.
रोहित पवार यांची वेगळी भूमिका
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगल तापले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, 27 वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणून औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसचा कबर हटवण्यास विरोध
काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंटबाजी करू नये. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातल फडणवीस सरकार वागत आहे. घाशीराम कोतवाल प्रमाणे गृहविभाग चालवले जात आहे. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूर पणाची आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे.
भाजप नेते अतुल भातखलकर म्हणाले, औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन विरोधकांकडून फुलं उधळली जातात. औरंगजेबाचे थडगे सजवून मुस्लिम तुष्टीकरण केले जात आहे. त्यामुळे मी विरोधकांना एवढाच इशारा देईन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचे पाप तुम्ही इतकी वर्ष केले. आता हिंदू समाज जागृत झालेला आहे. यापुढे औरंगजेबाचे थडगे वाचवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू समाज त्या औरंगजेबाच्या थडग्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही.