| दिघी | वार्ताहर |
दिघी – श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांना जोडणारा महत्वाचा दांडगुरी – बोर्ला हा मार्ग पूर्णतः खड्ड्यांत गेला आहे. या रस्त्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गंभीर बाब म्हणजे लाडक्या गणरायाचे आगमन ही याच खड्डेयुक्त रस्त्याने होणार आहे. मात्र खड़यांचे विघ्न श्रीवर्धनच्या बांधकाम प्रशासनला दूर करता नाही आले.
श्रीवर्धन मधील बोर्लीपंचतन मार्गावरून म्हसळा जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग आहे. या मार्गावर म्हसळा पर्यंतचा रस्ता 13 गावांना जोडला गेला आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांना व मुंबई येथे कामानिमित्त असणाऱ्या मुंबईकरांचा या रस्त्याला दिवसा रात्री अचानक प्रवास होतो. आड मार्ग म्हणून या मार्गाकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत आले आहे. या मार्गावर वावे गावापासून छोटे-मोठे खड्डे पडल्याने रस्ताच खड्ड्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अरुंद रस्त्यावरून वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 5 किलोमीटर अंतराचा अरुंद रस्ता असून त्यात डांबरीकरण रस्त्याला आता मातीच उरली आहे. या रस्त्याची खूप दयनीय अवस्था असून त्वरित रस्त्याची दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून व येथील ग्रामस्थांकडून होत आहे. या मार्गावरील चार किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच काम करण्यात येईल. असे उपविभागीय अधिकारी तुषार लुंगे यांनी सांगितले.







