बांधकाम विभाग लागले कामाला
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्या पुलांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, 15 मेपर्यंत ही पाहणी करून दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानुसार दोन्ही विभागातील बांधकाम विभाग कामाला लागले आहे.
ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साधला जातो. गावे, वाड्यांसह मुख्य रस्त्याला जोडणार्या साकवांची देखभाल दुरुस्ती व नवीन साकव बांधणीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत केले जाते. जिल्ह्यात गावे, वाड्यांना जोडणार्या साकवांची संख्या 80 हून अधिक आहे. तसेच शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित सुमारे 70 हून अधिक पूल आहेत. महामार्गासह जिल्हा रस्त्याला जोडणार्या या पुलांची दुरुस्ती बांधकाम विभागाद्वारे केले जाते. जिल्ह्यातील अनेक पुलांची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा अधिक आहे. परिणामी, अतिवृष्टीमुळे पूल कोसळण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाड येथील सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत धोकादायक पुलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी सूचना बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केली. या सूचनेनंतर जिल्ह्यातील बांधकाम विभाग कामाला लागले आहेत. वेगवेगळ्या पुलांची पाहणी करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कार्यवाही बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे.
पुलांची पाहणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार तयारी केली आहे. 15 मेपर्यंत अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
राहुल देवांग, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, रायगड
पुलांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या पुलांची देखभाल दुरुस्ती करायची आहे, त्या पुलांची देखभाल दुरुस्ती पाहणी करून केली जाईल.
जे.ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता,
बांधकाम विभाग, अलिबाग