वाहतूक सुविधांअभावी ऑनलाइन वर्गांना प्राधान्य
। नवी मुंबई । वार्ताहर ।
गेले दीड वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा कधी सुरू होतात याची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात सुमारे 75 टक्के उपस्थिती होती. यात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र यात दहा टक्क्यांची घट झाल्याचे दिसत आहे. पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता आहेच, शिवाय वाहतूक साधनांअभावी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक कचरत असल्याचे दिसत आहे.
4 ऑक्टोबरपासून आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा शहरात सुरू करण्यात आल्या आहेत. गेले दीड वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सुरक्षेबाबत शाळांना नियमावली देत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वाहतूक हा एक मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे.
कोरोनाकाळात अनेक पालक शाळेपासून राहण्यास दूर गेले आहेत. त्यांना वाहतूक साधन उपलब्ध नाही. शाळांना शाळेची बस किंवा खासगी वाहनांनीच मुलांना शाळेत पाठवा असे सांगितले आहे. मात्र दूर राहणार्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने बस मार्ग नसल्याने किंवा त्या भागात जास्त विद्यार्थी नसल्याने बस सेवा देण्यास नकार दिला आहे. तसेच रेल्वे प्रवासही करता येत नाही. त्यामुळे पालकांना स्वत: मुलांची ने-आण करावी लागत आहे. परिवहनच्या बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तसेच शाळांनी या बसमधून मुलांना शाळेत पाठवू नये असे सांगिल्याने काहींची गैरसोय झाली आहे. त्याचा परिणाम शाळेतील विद्यार्थी उपस्थितीवर होत आहे.