नियमांच्या उल्लंघनाचा ठपका
। पाली । वार्ताहर ।
अडुळसे गावालगत रिलायन्स जिओ इन्फ्राटेक प्रा.लि.कंपनीने अनधिकृतपणे नियमांचे उल्लंघन करून उभारलेला मोबाईल टॉवर हटविण्याचे आदेश गुरूवारी पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिले आहेत. या धोकादायक बेकायदा टॉवरसंदर्भात येथील स्थानिक रहिवासी संतोष बावधाने यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व पाली तहसील कार्यालयात तक्रार केली होत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 44 अ (3) अन्वये जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून औद्योगिक कारणाकरीता बिनशेती परवानगी न घेता या टॉवरचे अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बिनशेती दंड रक्कम शासन जमा करून या टॉवरचा अनधिकृत वापर 4 दिवसांत बंद करण्यात यावा, तसेच हा वापर बंद न झाल्यास बांधकाम शासकीय खर्चाने दूर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले.
अपघातांचा धोका वाढला
टॉवरचे बांधकाम रस्त्याच्या मध्यापासून 50 मीटर अंतराच्या आतमध्ये येते. त्यामुळे हा टॉवर रस्त्यापासून 15.60 मीटर अंतरावर असल्याने समांतर रेषा नियमांनुसार अनधिकृत ठरत असल्याने हा टॉवर काढून टाकण्यात यावा अशी नोटीस उपविभागीय अभियंता यांनी 3 नोव्हेंबर रोजी दिली आहे. याआधी वेळोवेळी सूचना देऊनही टॉवर काढण्यात आला नसल्याने अपघातांचा धोका वाढला होता.