| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात विविध जाती-धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने असून, प्रत्येकाला आपापली संस्कृती जपण्याचा व सण-उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांनी मुरुड पोलीस ठाण्यात आयोजित शांतता सभेत केले.
आगामी काळात येणार्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, कारण जनतेच्या सहकार्याशिवाय प्रशासनाला कोठे काय येणार नाही. सर्वसामान्य जनतेला आपले अधिकार आणि कर्तव्ये याची पुरेपूर जाणीव आहे. आगामी काळात होळी, धुळीवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा, ईद, रामनवमी असे विविध सण येत आहेत. ते सण गुण्यागोविंदाने साजरे व्हावेत, अशी अपेक्षा प्रकाश सकपाळ यांनी व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सण-उत्सव शांततेत पार पाडले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी भंडारी बोर्डींग अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, दैवज्ञ ब्राह्मण समाज महिला अध्यक्ष वासंती उमरोटकर, बाजारपेठ मोहल्ला उपाध्यक्ष मुसदीक कादरी, पेठ मोहल्ला अध्यक्ष अल्ताफ मलीक, विहूर उपसरपंच उलडे, माजी नगरसेवक प्रमोद फायदे, आदेश दांडेकर, काँग्रेस तालुका सचिव दर्शन काळभैरे, पोलीस नाईक आरती पवार, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व पोलीस स्टाफ 30 सभासद या बैठकीत उपस्थित होते.