नागरिक भयभीत; जिल्हाधिकार्यांसह सर्व शासकीय यंत्रणेकडे तक्रार
। नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील आंबेघर (ता.रोहा) येथील एका खासगी जागेत व भरवस्तीत भारती टेलिकॉम एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. खड्ड्यासाठी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दगड फोडतांना तेथून जवळच असलेल्या रामा काळूराम माळी यांच्या संपूर्ण घराला जेसीबी यंत्रामुळे मोठे धक्के बसल्याने तडे गेल्याचा आरोप रामा माळी यांनी केला आहे. त्यामुळे घरातील नागरिक भयभीत झाले आहेत. याप्रकरणी रायगड जिल्हाधिकार्यांसह सर्व शासकीय यंत्रणेकडे एका निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रिलायन्स प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेघर या गावातील एका खासगी जागा मालकाच्या जागेत जुलै महिन्याच्या साधारण दुसर्या आठवड्यात मोबाईल टॉवरसाठी खड्डा खोदण्याचे काम ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बिनधास्तपणे सुरु करण्यात आले. या कामामुळे घराला तडे पडत असल्याचे लक्षात येताच घरमालक रामा माळी यांनी ग्रामपंचायतीमध्ये याची माहिती दिली. यावेळी तक्रारी अर्ज देण्यास ग्रामपंचायतीमधून सांगण्यात आले. त्यानुसार माळी यांनी 21 जुलै 2022 रोजी तक्रारी अर्ज दिला व त्याच्या प्रती जिल्हाधिकारी, रोहा प्रांताधिकारी, रोहा तहसीलदार तसेच रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांसह सर्व शासकीय यंत्रणेला पाठविल्या.
माळी यांच्या तक्रारीनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने चार दिवसांनी येथील नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकल्याने ग्रामपंचायतीने हे काम थांबविल्याचे रामा माळी यांचे वडील ज्येष्ठ नागरिक काळूराम माळी (76) यांनी सांगितले.
दरम्यान रामा माळी यांच्या घरात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी व मुलगा असे पाचजण राहत असून संपूर्ण घराला तडे गेल्याने त्यांच्यावर सध्या जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता हे खोदकाम सुरू झालेच कसे? असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक काळूराम माळी यांनी उपस्थित केला असून तडे गेलेल्या घरामुळे काही दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार असेल, असा इशाराही रामा माळी यांनी निवेदनात दिला आहे. याप्रकरणी पिगोंडेचे सरपंच संतोष कोळी यांच्याशी संपर्क साधला असता मोबाईल टॉवरसाठी खड्डा खोदण्याची परवानगी ग्रामपंचायतीने दिली नसल्याने परस्पर सुरु करण्यात आलेले हे काम तक्रारीनंतर लगेच थांबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.