। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
शेतकर्याना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून मुंबई येथे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असता कारभारी म्हसलेकर यांनी जालन्यातील बदनापूर येथे येताच अकोला शिवारातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणार्या विहिरीत बुधवार (दि. 26) पासून उपोषण सुरू केले. तसेच, संपूर्ण कर्जमाफीशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यांना कर्जमाफीच्या वचनाचा विसर पडला आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी कारभारी म्हसलेकर आणि युवा सेनेचे ऋषी थोरात यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी अकोला गावात विहिरीत बाज टाकून आमरण उपोषण सुरू केले. सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्या विहिरीत हे आमरण उपोषण सुरू केले. या दोघासोबत अनेक शिवसैनिकांनी मुंबईत आंदोलन केल्याप्रकरणी या पदाधिकार्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी थेट विहिरीत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.