। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील वालवटी गावात दलीत वस्तीत सुधार रायगड जिल्हा परिषद योजनेंतर्गत नळ पाणी पुरवठा दुरुस्ती या कामाचे बील देण्यात येऊ नये. सदरचे बिल 10 लाखाचे असून दलीत वस्तीमध्ये कधीही पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली नाही. या योजनेचे बील दिले गेले तर आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन ग्रामीण पाणी पुरवठा कमिटीने केले आहे. वालवटी गावात तीन पाणी योजना राबवून बिले काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. आम्ही जी जुनी चालू असलेल्या जलवाहिनीला नवीन जल वाहिनी जोडल्याने समाजकल्याण खात्यांतर्गत नळ पाणी दुरुस्ती या शीर्षकाखाली नवीन पाईपलाईन कार्यान्वित केल्याचे दाखवून बिल काढण्याचा प्रकार सुरु होता. म्हणून जुन्या पाईप लाईनला जी नवीन पाईपलाईन जोडलेली आहे, ती खंडित करून पूर्वस्थित ठेवण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार ती पाईपलाईन खंडित केली आहे. या प्रकारामुळे संबंधितांचे बिल निघत नाही म्हणून आमच्यावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हे चुकीचे असून ते आम्ही न्यायालयात सिद्ध करणार आहोत. यावेळी वालवटीचे अध्यक्ष रझाक भुरे, सचिव शाबीर खतीब, उपाध्यक्ष दाऊद नाखवाजी, खजिनदार समीर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, सदस्य यशवंत पाटील, अरिफ गजगे, बबन शिंदे, दीपक पाटील, अर्शद मुकरी, तालुका उप प्रमुख मनोज कमाने आदी मान्यवरउपस्थित होते.






