| सुतारवाडी | वार्ताहर |
सध्या ऑनलाईन वस्तू मागविणे अगदी सोपे झाले असून, अनेक स्थानिक व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे. ऑनलाइन वस्तू खरेदी करताना फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येऊनसुद्धा वस्तू खरेदी करण्यामागे मोठा कल दिसून येत आहे. नित्याच्या वापरावयाच्या वस्तूपासून विविध गृहोपयोगी वस्तू एका मेसेजवर उपलब्ध होत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांच्या वस्तूला मागणी कमी असल्याने येथील हार्डवेअरचे मालक भवराराम परिहार यांनी आपली खंत व्यक्त केली.
भाजी, मासळी, किराणा सामान अगदी घरपोच होत असल्यामुळे दुकानं थाटून बसलेल्यांच्या ठिकाणी कमी गर्दी दिसत आहे. सध्याचे जीवन गतिमान झाल्यामुळे अनेकांना कामधंद्यामुळे खरेदीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन खरेदी हाच पर्याय त्यांच्या पुढे आहे. मात्र, ऑनलाइन खरेदीमध्ये अनेकांना मोठा गंडा घातला गेला आहे. मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचेही उघड झाले आहे. घरोघरी फिरणारे लहान व्यापारी कपड्यांपासून कांदे, बटाटे, लसूण, भाजीपाला घेऊन येत असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांची कुचंबना होत असते. हे चक्र आता थांबणारे नाही. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या मालाला उठाव नाही. काहींनी आपला व्यवसाय बंद केला आहे. दुकानं बंद करून त्या ठिकाणी हॉटेलची निर्मिती केली आहे. चायनीज व्यवसायला तर मोठी उभारी मिळाली आहे.