| रोहा | वार्ताहर |
तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गृहिणींची कडधान्ये सुकविण्याची एकच लगबग सुरू झाली आहे. दैनंदिन आहारामध्ये विविध प्रकारच्या कडधान्यांना मोठे महत्त्व आहे. याशिवाय कडधान्यांतून मिळणारी प्रथिने व स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्व यामुळे ते आरोग्यासाठी हितकारक ठरत आहेत. कडधान्यांना चांगले ऊन दिले तर त्यांना कीड न लागता किंवा पावसाळ्यात दमट न राहता चांगल्या स्थितीत राहतात. ऊन दिलेले कडधान्ये वर्षानुवर्षे टिकतात. याशिवाय कडधान्ये उन्हात चांगली वाळवली असता, त्यांच्यात अधिक पौष्टिकता येत असल्याचे जुन्या जाणत्या गृहिणींचे म्हणणे आहे. पावसाळ्यात वाल पाण्यात भिजत ठेवून त्यापासून बिरड्याची भाजी बनविणे. तसेच गावठी तेरीच्या भाजीमध्ये वालाची डाळ टाकून भाजी तयार करणे, असे विशिष्ठ मोसमात अनेक कडधान्यांची कल्पकतेने भाजी बनविणे ही कला गृहिणींना अधिक माहिती असल्याने त्याच्या सुकविण्यावर अधिक भर दिला जातो. कडधान्ये सुकविण्यासाठी एप्रिल आणि मे मधील मिळणारे कडक ऊन हे अधिक फायदेशीर असते. यासाठी रोहा तालुक्यातील विविध भागात कडधान्ये सुकविण्यासाठी गृहिणींची एकच लगबग सुरू झाली असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.