। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील माथेरान येथील शिवसेनेचे कार्यकर्ते प्रसाद सावंत यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देणारी पोस्ट केल्याबद्दल सावंत यांच्यावर कर्जत येथे 25 जून रोजी हल्ला झाला होता. त्या हल्यात हल्लेखोर यांनी वापरलेली इर्तिका जीप कर्जत पोलिसांनी तब्बल 55 दिवसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित 10-15 हल्लेखोर यांच्यापैकी केवळ पाच जण अटकेत असून, त्या सर्वांना न्यायालयीन कोठडीत असतानादेखील कर्जत कचेरी येथील कोठडीत ठेवल्याने कर्जत पोलिसांच्या कारभाराबद्दल प्रसाद सावंत यांनी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
कर्जत येथे माथेरान येथे शिवसेनेचे कार्यकर्ते प्रसाद सावंत यांच्यावर 25 जून रोजी हल्ला झाला होता.त्यानंतर कर्जत पोलिसांनी प्रथम दोन आणि नंतर तीन अशा पाच हल्लेखोर आरोपी यांना अटक केली होती. मात्र तक्रारदार श्रेयस गायकवाड यांनी आपल्या फिर्यादीत दहा ते पंधरा जणांच्या जमावाने मारहाण केली असल्याची नोंद केली होती. मात्र त्या घटनेला 55 दिवस पूर्ण झाले असले तरी अद्याप या हल्ल्यातील सर्व हल्लेखोर आरोपी यांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. मात्र आता घटना घडल्यानंतर तब्बल 55 दिवसांनी हल्लेखोर यांनी सोबत आणलेली एमएच 46, बी क्यू 9282 ही जीप ताब्यात घेतली आहे. कर्जत तालुक्यातील मिलिंद बंधू कडू यांच्या मालकीची ती गाडी असून, त्या गाडीबद्दल कर्जत पोलीस अधिक तपास करीत आहेत.