| माणगाव | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी परिसरात राहणार्या आरती इंगळे या विवाहितेचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपींस माणगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिला 13 वर्षानंतर न्याय मिळाला आहे. मौजे भावे पठार गावचे हद्दीतही घटना घडली होती. दरम्यान घडला आहे.
पती नरेंद्र इंगळे याच्यासमवेत आरतीचे भांडण झाले होते.त्यावरुन नरेंद्रने सुरेंद्र इंगळे, नरेंद्र मनोहर इंगळे, रंजना मनोहर इंगळे, सुषमा मनोहर इंगळे, हरिष तानाजी कदम, सुजाता हरिष कदम यांनी तिला बळजबरीने पकडून ठेवत बांधून ठेवले. तिचे विळ्याने नाक कापून ओढणीने गळा आवळून ठार मारले. हा पुरावा नष्ट करण्यासाठी तिला बोरीचा आड म्हणून ओळखल्या जाणार्या विहिरीत ढकलून दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करुन सर्व आरोपीना अटक केली तसेच त्यांच्याविरोधात खटलाही दाखल केला.
न्या. एन.एस.कोले यांच्या पुढे या खटल्याची सुनावणी झाली. खटल्यामध्ये अति. जिल्हा शासकिय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी काम पाहिले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान तपास अधिकार धन्यकुमार गोडसे, यु.एल. धुमास्कर, शशिकांत कासार, छाया कोपनर, शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले. न्यायालयाने नरेंद्र मनोहर इंगळे, मनोहर गोविंद इंगळे व रंजना मनोहर इंगळे याना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रु. 5000/- दंड न भरल्यास 6 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.