। नवी मुंबई । वार्ताहर ।
बुधवारी रात्री 12 च्या सुमारास नवी मुंबईत काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते. मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मारबे धरण पाणलोट क्षेत्रात फक्त 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत नवी मुंबई 241 मि.मी पाऊस झाला आहे.
नवी मुंबईत 10 जूनपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र आतापर्यंत मोठा पाऊस झालेला नाही. पावसाने गेले 20 दिवस दडी मारल्याने शहरावर कधी नव्हे ती पाणीकपातीची वेळ आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणात गेल्या वर्षीपेक्षा पाचपटीने कमी पातळी असल्याने चिंता व्यक्तहोत आहे. आणखी काही दिवस पावसाची हीच परिस्थिती राहिल्यास पाणीकपातीची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लागून आहेत.
गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास काही भागांत अर्धा तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे पावसाने जोर धरल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी दिवसभर शहरात व मोरबे धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. त्यामुळे दिवसभरात फक्त 18 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात शहरात सर्वाधिक पाऊस नेरुळ परिसरात झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद ऐरोली विभागात झाली आहे. सायंकाळनंतर पावसाने थोडा जोर पकडला असल्याचे दिसून आले.