बॅनरबाजी आणि टपर्यांचा विळखा
। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरातील गांधी मंदिर वाचनालयासमोरील पन्नास वर्षापूर्वी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक एखादया अडगळीप्रमाणे दुर्लक्षित झाले आहे. स्मारकाच्या समोर संरक्षण भिंतीच्या बाजुने टपर्या, दुकाने उभ्या केलेल्या आहेत. तसेच भिंतीच्या कुंपनावर बॅनरबाजी करून राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी पन्नास वर्षाचा इतिहास जणू काही पेणकरांच्या नजरेआड केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त तत्कालीन केंद्र सरकारच्यावतीने 14 ऑगस्ट 1972 रोजी पेण गांधी मंदिरासमोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले होते. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा,अशी या मागची धारणा होती. यामध्ये स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना दिली होती.
यामध्ये विनायक नारायण लिमये, मुकुंद नारायण लिमये, नारायण मार्तन्ड धारकर, रामचंद्र नारायण मंडलिक, गणपत धाकू हुजरे, काशीनाथ नारायण दांडेकर, प्रभाकर गणेश प्रधान, परशुराम रामचंद्र दाते, गणेश रघुनाथ लिमये, जर्नादन केशव दामले, नारायण यशवंत नेने, विष्णू नारायण परांजपे, गोविंद चिंतामण जोग हे सर्व पेण शहरातील तर शंकर रामा म्हात्रे, विठ्ठल पोसू ठाकूर हे दोघे दिव. हिरू महादू म्हात्रे, गौर्या आंबू सोनावळे हे दोघे वाशी, गणू बाळू ठाकूर रावे आणि भारतरत्न आचार्य विनोबा भावे गागोदे अशा 20 स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश आहे. परंतु या इतिहासाला पेण नगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे स्मारक झाकल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते. एकीकडे देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे पेण शहरात असलेल्या इतिहासाचा ठेवा दुर्लक्षित होत आहे.
स्मारकाची दयनीय स्थिती
आज त्या स्मारकाची अवस्था दयनीय झाली आहे. नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या या वास्तुभोवती चोहोबाजूने अतिक्रमण झालेले आहे. संरक्षक भिंतीवर राजकीय पुढार्यांचे व खासगी क्लासेसवाल्यांच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आलेले आहेत.त्यामुळे सारा परिसर विद्रुप झालेला आहे. आतील बाजुला अनेक मोठमोठाली झाडे झुडपे वाढली आहेत.लाईटची व्यवस्था नादुरुस्त झालेली आहे. आवारात असलेला कारंजा पूर्णपणे खराब झालेला आहे. स्मारकाच्या आता गांडूळखत तयार करण्याचा एक प्लास्टिकचा संच आहे. मात्र, त्याच्यात पाल्याव्यतिरिक्त काही दिसत नाही. संरक्षणभिंतीना उंदीर, घुशींनी पोखरुन काढले आहे.
इतिहासाकडे दुर्लक्ष
पेण नगरपालिका लाखो रूपये स्वच्छतेसाठी खर्च करत आहे. स्वातंत्र्य सैनिकाच्या इतिहासाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या स्मारकाच्या भोवती एकूण अकरा टपर्या उभ्या आहेत. तिथे चिकनपासून भाजीपाल्यापर्यंत विक्री होत आहे व काही नगरपालिकेचे कर्मचारी या टपरी चालकांजवळून महिन्याला भाडे आकारत आहेत. मात्र, टपरीचालक त्या कर्मचार्यांचे नाव सांगण्यास धजावत नाहीत. या अनधिकृत टपर्यांच्यामुळे हुतात्मा स्मारकाच्या आतील ऐतिहासिक ठेवा सर्वसामान्यांना दिसत नाही. तसेच आजच्या पिढीपासून हा ठेवा जणू काही लपवला जात आहे. तरी याकडे नगरपालिका प्रशासनाने योग्य लक्ष देउन हुतात्मा स्मारकाचा परिसर बॅनर व टपर्या मुक्त करावा ऐवढीच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे.
तिरंगा फडकवा
शासनाच्या आदेशानुसार हर घर तिरंगा या अभियानांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकावर देखील राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. पेणमधील या हुतात्मा स्मारकाच्या परिसरात राष्ट्रध्वज उभारला जावा, अशी आग्रही मागणी पेणच्या नागरिकांकडून केली जात आहे.
हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणावरील सर्व टपर्या हटविल्या जातील. स्मारकात लाईटची व्यवस्था देखील केली जाईल. तसेच कारंजा पुर्ववत सुरू करु.
– जीवन पाटील, मुख्याधिकारी