वारंवार होणार्या पाणीगळतीने नागरिक त्रस्त
| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली नगरपंचायतीचा भोंगळ कारभार वारंवार होणारी पाणीगळती थांबवण्यात नगरपंचायत अपयशी ठरत आहे. हटाळेश्वर चौकातील सतत रहदारी असणार्या मार्गावर पटेल यांच्या किराणा मालाच्या दुकानालगतच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून, पाण्याची गळती सुरू आहे. नगरपंचायतीने दुरुस्तीच्या नावाखाली खड्डा खोदून ठेवला आहे व त्याची माती रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. तसेच खोदलेल्या खड्ड्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे, ज्यामुळे शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.
वारंवार पालीमधील होणार्या पाणीगळतीला जबाबदार कोण? पालीतील पाणीगळतीची समस्या थांबणार तरी कधी? याबाबत पाली नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी लक्ष देतील का? वारंवार होणार्या पाणीगळतीमुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाली नगरपंचायत यावर ठोस उपाययोजना केव्हा करणार? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.