बिशनसिंग बेदी! फक्त नावच पुरेसे आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचे वर्णन करण्यासाठी. त्याची गोलंदाजीची मोजवयाच पावलांची चाल आणि त्यानंतर चेंडू टाकल्यानंतरची करामत. क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा एक अध्यायच लिहून गेली. डावखुरी फिरकी जेवढी भेदक, तिखट आणि परिणामकारक होती, तेवढेच त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी, प्रखड आणि स्पष्टवक्तेपणाचे होते. खेळपट्टीवर पडलेला त्याचा चेंडू ज्या त्वेषाने वर उसळायचा आणि वळायचा तेवढाच मैदानाबाहेरचा बिशन अन्यायाविरूद्ध पेटून उठायचा. त्यामुळेच एकीकडे डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून त्याची कारकिर्द बहरत असताना, दुसरीकडे अनेक वादाच्या ठिणग्याही पडत होत्या. नामवंत फलंदाजांना जशी त्याची फिरकी गोलंदाजी कधीही कळली नाही तसंच माणूस म्हणूनही बिशन समाजाला कधीही समजला नाही. अगदी त्याच्या आप्तस्वकियांना, क्रिकेट संघांतील त्याच्या नजिकच्या सहकाऱ्यांनाही तो कधीही उमगला नाही. क्रिकेट पदाधिकारी आणि त्याचे उभे वैर होते. हे वैर त्याने स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेले नव्हते तर क्रिकेटपंटूवर अन्याय होताना तो स्वस्थ बसू शकायचा नाही. वैयक्तिक जीवनात त्याने ऑस्ट्रेलियन पत्नीबरोबर केलेला संसार बऱ्याच कालावधीनंतर मोडला. त्यानंतर मात्र त्याने भारतीय पत्नीसोबत उर्वरित आयुष्य आनंदात घालविले. बिशनला वाचनाची प्रचंड आवड होती. तेवढाच तो पाककलेतही वरच्या दर्जाचा बल्लवाचार्य होता. त्याच्या या दोन आवडी त्याच्या मुलांमध्ये होत्या. त्यापैकी अंगदने पाककलेतही नाव कमाविले होते. एकंदरीत हवाहवासा वाटणारा हा क्रिकेटपटू होता. मात्र त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्यातील दाहकता जाणवायची. त्याचे चटकेही बसायचे. समोरच्या दोषी व्यक्तींना आणि सोबतच्यांनाही. तो स्पष्टवक्ता होता. आणि स्पष्टवक्ता व्यक्तीच्या वाट्याला येणारी हेटाळणीही त्याने सहन केली. तो क्रिकेटमधील ढोंगी प्रशासकांना नडला. त्यांचे बुरखेही त्याने फाडले.
1967 ते 1979 या कालावधीत बिशनसिंग बेदी यांच्या 67 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत डावखुऱ्या फिरकीची कला तमाम क्रिकेट विश्वाने पाहिली. 67 कसोटीतील 266 बळी त्यांच्या डावखुऱ्या फिरकीला मिळालेली योग्य दाद नाही. कारण बेदी यांच्या काळात जगातील फलंदाजांच्या विकेट वाटून घेण्यासाठी आणखी तीन ग्रेट फिरकी गोलंदाज वाटेकरी होते. त्यामुळे डावातील 10 आणि सामान्यातील 20 बळी नेहमी चौघांमध्ये विभागले जायचे. प्रसन्ना, चंद्रशेखर आणि वेंकटराघवन हे भिन्न शैलीचे फिरकी गोलंदाज भारतासाठी जवळजवळ एकच कालखंडात खेळले. इंग्लिश कौंटी नॉर्दम्पृतशायरच्यावतीने बिशन यांनी कारकिर्द गाजविली. सतत सराव करून फिरकी गोलंदाजीवर त्यांनी हुकूमत मिळविली होती. गोलंदाजीच्या सरळ-सोपा रनअप सहज सुंदर चाल आणि एकाच ॲक्शनने टाकलेल्या चेंडूची विविधता. त्यांच्या सहज सुंदर शैलीमुळे क्रिकेट पाहताना आगळावेगळा आनंद मिळायचा. अमृतसरच्या रस्त्यांवर लहानपणी संगमरवरी दगडांनी खेळत खेळत मोठा झालेला हा क्रिकेटपटू ते दगड हाताळल्यामुळे कणखर मनोवृत्तीचा बनला. कोणताही अन्याय त्याने कधीही सहन केला नाही. खेळत असताना खेळाडू म्हणून, कप्तान म्हणून आणि नंतर प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती सदस्य म्हणूनही. त्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या क्रिकेटचा फायदा झाला. पण नंतर त्याआधी त्या संघर्षाच्या आगीत बिशनसिंग नामक एक व्यक्तिमत्व होरपळून गेले.
मद्रास कसोटीत इंग्लंडच्या जॉन लिव्हर या गोलंदाजाने व्हॅसलिनचा वापर करून भारतीय फलंदाजांची दाणादाण उडविली. त्यावेळी रंगेहाथ पकडलेल्या जॉन लिव्हर या गोलंदाजाला शिक्षा झाली नाहीच. उलट बिशनसाठी इंग्लिश कौंटीचे दरवाजे कायमचे बंद झाले. कप्तान असताना बिशनसिंग बेदी अन्यायाला अंगावरच घ्यायचा. नागपूर येथील कसोटीचा किस्सा त्यांनी सांगितला होता. नागपूरच्या एमएलए हॉस्टेलमध्ये संघ राहत होता. खेळाडूंना आंघोळीला ऐन थंडीत गरम पाणी मिळाले नाही. म्हणून बेदी यांचा पारा चढला होता. त्यांनी असोसिएशनच्या सचिवांना सांगितले, लोक तुम्हाला नाही तर आम्हा खेळाडूना पहायला येणार आहेत, तेव्हा गरम पाण्याची तडक व्यवस्था करा. गरम पाणी काही आले नाहीच. परंतु गरम झालेल्या त्या पदाधिकाऱ्याने बेदी आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी रेल्वेचे फर्स्टक्लासचे तिकिट बुक केले नाही. बेदी आणि त्यांचे सहकारी ‘अनरिझर्वड’ बोगीतून, सामान्यांसाठीच्या डब्यातून थंडीत प्रवास करण्याची शिक्षा भोगत होते. असे अनेक किस्से बेदी यांच्या हाती सूत्रे असताना घडले आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना एका दौऱ्यात खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर नाराज झालेले बेदी म्हणाले होते, ‘तुम्हाला अरबी समुद्रात बुडवायला पाहिजे.’ पण भारताने वेस्ट इंडिजवर 406 धावांचा पाठलाग करून मिळविलेला पोर्ट ऑफ स्पेनमधील ऐतिहासिक विजय बेदी यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांना क्रिकेटच्या कलेचे व्यापारीकरण, विकृतीकरण केलेले कधीच आवडले नाही. कसोटी क्रिकेटचे ते समर्थक होतेच. मात्र ट्वेेन्टी-20 क्रिकेट हे क्रिकेटच नव्हे असे त्यांचे ठाम मत होते. आयपीएल स्पर्धा त्यांना कधीच रूचली नाही. यातले पैसे येतात कुठून आणि जातात कोठे या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर अजूनही कोणीही देवू शकले नाही.
दिल्लीच्या फिरोझशहा कोटला मैदानाला राजकारणी अरूण जेटली यांचे नाव देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. बिशनसिंग बेदी आणि सुनील गावसकर या तत्कालीन दोन महान क्रिकेटपटूंमध्ये व्यक्तिमत्वाची लढाई व्हायची. मात्र त्या शीतयुद्धात भारतीय क्रिकेटचे नुकसान त्यांनी होऊ दिले नाही. दोघेही एकमेकांचे विरोधक होते पण तेवढेच एकमेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुकही करायचे. असा हा विविधांगी, विविधढंगी, क्रिकेटपटू मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कृतींमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात राहिला. तरी त्यांचे जाणे मनाला चटका लावणारेच!
Email: vinayakdalvi41@gmail.com