| रसायनी | वर्ताहर |
चौक बाजारपेठेत वाहनचालक बेशिस्तपणे वाहन कुठेही उभे करतात. तसेच, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे देखील याठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न चौक पोलीस करीत असतात. रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी पोलिसांना पायी गस्त घालण्याचे सूचना केल्या आहेत. त्यामुळे नुकतेच चौक पोलिसांनी संपूर्ण बाजारपेठेतून पायी गस्त घातल्याने बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे.
चौक ही चाळीस गावची बाजारपेठ असून ती नेहमीच गजबजलेली असते. याठिकाणी अनेक प्रकारची दुकाने, बँक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शासकीय कार्यालये असून, वाशिवली, वडगांवसाठी जाण्याचा मार्ग देखील याच बाजारपेठेतून जात असल्याने प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. तुपगाव कॉर्नर येथे अनधिकृतपणे फेरीवाले बसतात. त्यातच सर्वच चालकांना घाई असल्याने आणखी वाहतूक कोंडीची भर पडतो. पोलीस उप निरीक्षक विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलिसांनी पायी गस्त घातल्याने अनेक बेशिस्त दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक यांच्यात धडकी भरली आहे. दरम्यान, चौक पोलिसांनी पायी गस्त घातल्याने चौक बाजार पेठेत आलेले ग्राहक, व्यापारी, नागरिक आणि बाजारेठेने मोकळा श्वास घेतला आहे.







