महाड | चंद्रकांत कोकणे |
जलप्रलयाने हाहाकार उडवून दिलेल्या महाडनगरीची अवस्था अतिशय शोचनिय अशीच झाली आहे. बघावे तिकडे चिखलाचे साम्राज्य, घरातील चीज वस्तुंचा पुराच्या पाण्याने झालेला लगदा, बंद पडलेली शेकडो वाहने,मध्येच कुठेतरी पुराच्या पाण्याने मृतावस्थेत पडलेली जनावरे, त्यांची पसरलेली दुर्गंधी असे भयावह वातावरण महाडमध्ये आजमितीस आहे.सावित्रीच्या जलप्रलयाने अवघ्या महाडला पुरते उद्धवस्थच करुन टाकलंय.यातून सावरायचे कसे आणि कुणी कुणाला सावरायचे याचीच चिंता सर्वांना लागली आहे.बरं आपल्या वेदना सांगायच्या तरी कुणाला.कारण प्रत्येकाला या पुराची झळ बसल्याने प्रत्येकाला आता पुन्हा एकदा खंबीरपणे उभे रहावे लागणार आहे.
सावित्रीला पूर येणे हे महाडकरांसाठी नवे नाही.उलट दरवर्षी पूर आला नाही तर पावसाळा आल्यासारखे महाडच्या जनतेला वाटायचे नाही.पण गेल्या आठवड्यात पडलेल्या जलप्रलयाने महाडचे होत्याचे नव्हते करुन टाकले.असा जलप्रलय महाडच्या जनतेने प्रथमच अनुभवला असे अनेक जुन्या जाणत्या रहिवाशांचे म्हणणे आहे.आतापर्यंत पूर आला की गावात पाणी शिरायचे.ठराविक अंतरापर्यंत पाणी आल्यानंतर ते आपोआपच कमी व्हायचे हा सावित्री मायचा शिरस्ता.पण यावेळी हीच सावित्री कोपली आणि तिने आपले रौद्ररुप दाखवून दिले.
महामार्ग ठरतोय धोक्याचा
या सर्व जलप्रलयाला सध्या सुरु असलेल्या महामार्गाचे काम धोक्याचे ठरतंय असे आता जाणवू लागले आहे.कारण महामार्गाची निर्मिती करताना सरकाने अथवा काम करणार्या ठेकेदार कंपन्यांनी या परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा पूर्णपणे अभ्यासच केला नाही.कोकण रेल्वेची निर्मिती करताना रेल्वे मंत्रालयाने या परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच रेल्वेची निर्मिती केली.त्यामुळे आजपर्यंत तरी रेल्वेच्या कामांमुळे अशी दुर्घटना घडल्याचे कधीच दिसून आलेले नाही. उलट महामार्गाची निर्मिती होत असताना असा शास्त्रोक्त अभ्यासच झालेला नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.जिथे जिथे नैसर्गिक प्रवाह आहेत ते सर्व या महामार्गात पूर्णपणे उद्धवस्थ झालेले आहेत.त्यामुळेच सावित्रीचा मार्ग एकप्रकारे रोखला गेला आणि त्याचा परिणाम या जलप्रलयात झाला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
पुराचे संकट महाडकरांना नवे नाही.पण आताच्या जलप्रलयाने सारेच हादरुण गेलेले आहेत.त्यातच जिल्हा प्रशानसाने देखील पूरस्थितीबाबत कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे दिसून येते.वास्तविक महाडला आपत्ती व्यवस्थापनाची बैठक सातत्याने होणे गरजेचे आहे.पण दुर्दैवाने तसा प्रकार झालाच नसल्याने ही मोठी आपत्ती ओढावली.याचा फटका सरकारी यंत्रणेला सुद्धा बसलाय.शहरातील अनेक कार्यालये जलमय झाल्याने कार्यालयांमधील सर्व कागदपत्रे भिजून ती पूर्णपणे नष्ट झालेली आहेत.शिवाय संगणकही पाणी गेल्याने डेड झालेली आहेत.आता नव्याने पुनश्च हरिओम म्हणून महाडकराना सुरुवात करावी लागणार आहे.
महाडचा आवाज लुप्त झाला
या महापुराचे संकट असतानाच महाडकरांना माजी आमदार माणिकराव जगपात यांच्या अकाली निधनाचा मोठा धक्का सहन करावा लागलायं.कारण अशा संकटाच्यावेळी माणिकराव हे महाडकरांसाठी मोठे आधार होते.यापूर्वी ज्या ज्या वेळी महाडवर संकटे आली तेव्हा सत्तेत असो वा नसो माणिकराव धावून येत असतं.मदतसाठी सर्वतोपरी प्रयत्नही करीत असतं.आता सुद्धा जिवंत असते तर त्यांनी आपल्या परीने महाडकरांना दिलासा देण्याचे काम केले असते.पण महाडकरांचा आपला आवाजच नियतीने हिरावून नेला आहे.हे शल्य येथील जनतेला बोचल्याशिवाय राहणार नाही.
महापुरातही महिलेची यशस्वी प्रसुती
निसर्गाचा प्रकोप, उध्वस्त हॉस्पिटल,वीज,पाणी,वैद्यकीय साहित्य काहीही हाताशी नसताना,चिखल व घाणीचे साम्राज्य अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हॉस्पिटलच्या दाराशी गाडीमधे प्रसूती वेदनेने तळमळत व घाईवर असलेला पेशन्ट व त्यांचे नातेवाईक असहाय्य व हतबल,अशा गंभीर वातावरणात प्रसंगावधान राखून सुकाळे नर्सिंग होमचे संचालक डॉ. नूतन व डॉ. राहुल सुकाळे यांनी संकटात असलेल्या महिलेची गाडीच्या व बॅटरीच्या अंधूक प्रकाशात स्टाफच्या मदतीने सुखरूप सुटका केली.