| पेण | वार्ताहर |
महसूल विभागाच्या पेण ग्रामीणमध्ये मोडणार्या आणि तात्पुरत्या बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये जोडलेल्या तांबडी, उंबरमाळ, खौसा, काजुचीवाडी, केळीचीवाडी या पाच आदिवासीवाडीतील ग्रामस्थ स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी आग्रही असून, तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात होते.
या ग्रामसभेत आदिवासींच्या स्वतंत्र ग्रामपंचायत, पिण्याचे पाणी योजना, रस्ते, वीज जोडणी, वनहक्क दावे याबाबत सविस्तर चर्चा घडवून विविध ठराव पास केल्याची माहिती बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुधीर पाटील यांनी दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, शासनाच्या स्वतंत्र ग्रामपंचायत बनवण्याच्या निकषांमध्ये कमी लोकसंख्येमुळे प्रस्ताव देण्यास अडचणी निर्माण होत असली विशेष बाब म्हणून सदर प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
सदर ग्रामसभेत पाचही आदिवासीं वाड्यांवरुन आदिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आदिवासींना भेडसावणार्या प्रश्नावर सुनिल वाघमारे, काळ्या कडू, सोमा खाकर, नीलम वाघमारे यांनी विविध ठराव मांडून चर्चा केली. यावेळेस पेण पं. समितीचे ग्रामविस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे निरीक्षक भानुशाली, ग्रामसेवक गणेश पाटील, वनरक्षक निलेश वार्डे, प्रियंका साप्ते, कृषी सहायक अनंत पाटील, उपसरपंच मधुरा महाडिक व अंकुर ट्रस्ट, ग्रामस्वराज समिती या संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस वनहक्क मान्यता कायदा व त्यामधील तरतुदीबाबत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी चित्रफित दाखवून सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दाव्याच्या प्रलंबित समस्येवर मार्गदर्शन तसेच राजेंद्र पाटील (दुश्मी) यांनी जनजीवन मिशन योजनेविषयी पारदर्शक कारभार करण्याची मागणी केली.