। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील गोवे गावाकडे जाणार्या रस्त्याच्या मुख्य चौकात येथील दोन्ही बाजूची वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली आहे. मुंबईकडून कोलाडकडे जाणार्या वाहतूकीसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेला आहेत. परंतु, कोलाडकडून मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. या एकेरी रस्त्याने जात असताना वाहन चालकांना अचानक दुसर्या बाजूला जावे लागत आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचा धोका वाढला असुन विद्यार्थ्यांसहित प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. एखादा मोठा अपघात झाला तर याला संबंधित ठेकेदार जबाबदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील पुई येथील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारी वाहतूक जुन्या पुलावरून वळविण्यात आली आहे. परंतु, कोलाड बाजुकडून येणारी वाहतूक गोवे गावाकडे जाणार्या मुख्य चौकात आल्यानंतर येथे कोणताही दिशादर्शक फलक नसल्याने दुसर्या बाजूकडे जाण्यासाठी वाहन चालकांची तारंबल उडत आहे. त्यामुळे या अपूर्ण रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच या महामार्गावरील पुई पेट्रोल पंपा समोरून गोवे गावाकडे जाणारा रस्ता हा ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अपूर्ण राहिलेला आहे. त्यासाठी स्थानिकांनी गोवे गावाकडे जाणार्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी होळी नंतर हे काम पूर्ण केले जाईल, असे संबंधित ठेकेदाराने आश्वासन दिले होते. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.
गोवे येथे तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज आणि कोलाड हायस्कुल असून येथे असंख्य विद्यार्थी येत असतात. तर, धाटाव एमआयडीसीत जाणारे कामगार, कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक याच मार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, कोलाड बाजुकडून येणारी वाहने सरळ दुसर्या बाजुकडे उभ्या असणार्या प्रवाशांच्या समोर येत आहेत. त्यामुळे त्यांना आपला जीव मुठीत धरून उभे राहावे लागत आहे. जर याठिकाणी अपघात झाला आणि एखाद्याचा नाहक बळी गेलाच तर या सर्वस्वी जबाबदार संबंधीत ठेकेदारच असेल, अशी संतप्त प्रतिक्रीया स्थानिकांसह प्रवासी वर्गातून होत आहे.