। मुंबई । प्रतिनिधी ।
सत्ता आहे म्हणून ऑपरेशन. सत्ता नसेल तेव्हा अख्खं दुकान खाली होईल. ईडी, सीबीआय दोन तासांसाठी आमच्या हातात द्या, तेव्हा अमित शहाही मातोश्रीवर येऊन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. चंद्रशेखर बावनकुळेंसह सगळेच तेव्हा कलानगरच्या दारात दिसतील. त्यामुळे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्हीही सत्ता भोगली आहे. मात्र, इतक्या विकृत पद्धतीने आणि सूड बुद्धीने सत्ता राबवली नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. ते रविवारी (दि.16) माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार्या रामदास कदम यांचाही समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, दुसर्यांना तोंड नाही का? सगळ्यांना तोंड आहेत. जो बाडगा असतो तो जोरात बांग देतो. त्यामुळे या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी. शिंदे गटाने आपला शत्रू कोण हे ठरवायला पाहिजे. उद्धव ठाकरे किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिले. त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे नैतिकतेला धरून नाही. आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या नसाल हे लक्षात घ्या. कधीकाळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. आपण त्यांच्यासोबत बसून तासन्तास चर्चा केली आहे. आमदारकी, मंत्रीपदं मिळवलेली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा विधान परिषदेवर पाठवले होते. ही कृतघ्नता राजकारणात नसेल तर माणुसकी शून्य आहे, असेदेखील संजय राऊत म्हणाले.