। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेतील महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास 300 ते 350 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावातील प्रत्येक घरात दोन-तीन जणांना मध्यरात्रीपासून उलट्या, जुलाब सुरु झाले. इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला, पुरुष व वृध्द अशा सुमारे 100 जणांवर बुधवारी उपचार सुरु असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा होती. यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मात्र, मध्यरात्रीनंतर काहीजणांना जुलाब आणि उलट्या सुरु झाल्या. पहाटेपर्यंत संपूर्ण गावालाच ही बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु बाधितांची संख्या वाढतच चालल्याने त्यांना आसपाससह इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊ लागल्याने रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडाली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने तातडीने यंत्रणा गतिमान करत सर्व वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, परिचारक, कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली. तसेच, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन 100 रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आणि रुग्णांवर उपचार सुरु केले.