रत्नागिरी । प्रतिनिधी ।
विपुल नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे स्थापन होत असलेले हे उपकेंद्र एक आदर्श ठरेल असा आशावाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या गरजा लक्षात घेऊन कौशल्याधारित आणि व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार करावेत असेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सागरी अध्ययन क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा अभ्यास करून त्या आधारे अभ्यासक्रम तयार केला जाईल. लवकरच येथे स्पर्धा परीक्षा तयारीचे केंद्रही सुरू केले जाईल,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.या उपकेंद्रामध्ये कौशल्याधारीत अभ्यासक्रम त्याचबरोबर उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे,असे कुलगुरू सुहास पेडणेकर म्हणाले.