तहसीलदार याची अधिकारी वर्गाला सुचना
। खोपोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका पोल्ट्रिफार्ममध्ये प्रक्रिया करीत पिल्लांची उत्पत्ती केली जात असल्याचा व्यवसाय सुरू असून या व्यवसायामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या दुर्गधीला सामोरे जावे लागत असल्याने या पोल्ट्रिफार्मच्या दुर्गधीमुळे ग्रामस्थवर्ग हैराण झाले आहेत. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी याच्या प्रमुख उपस्थित पंचायत समितीचे अधिकारी, पोलीस प्रशासन, प्रदूषण मंडळ अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी, बीडखुर्द ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी, ग्रामसेवीका, ग्रामस्थ, महिला वर्ग, राजकीय नेते, पोल्ट्री व्यवसायिक मंडळी अशी संयुक्त बैठक पार पडली असता ग्रामस्थांना होणार्या त्रासाची आक्रमकपणे भुमिका ग्रामस्थांनी मांडून आरोग्यास हानी पोहचवणारी पोल्ट्री बंद व्हावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली असून तहसीलदार तांबोळी यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाला पोल्ट्रीचे अहवाल लवकरच सादर करा अशा सूचना केल्या. तर ग्रामस्थ पोल्ट्री बंद करण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम असून जो पर्यंत या व्यवसायिकावर कोणतीही कडक कारवाई होत नाही तो पर्यंत गप्प राहणार नाही. तसेच वेळ पडल्यास आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागले तरी चालले. तर ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे याठिकाणी ग्रामस्थ विरोध पोल्ट्री व्यवसायिक हा संघर्ष टोकाची भुमिका घेऊ शकतो, त्यामुळे संबंधित विभागाने याचे गांभीर्य घेत पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई करणेच हिताचे ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी, पोलिस निरीक्षक अनिल विभूते, प्रदूषण मंडळ अधिकारी किल्लेदार, बीडीओ बालाजी पुरी, ग्रामसेवीका मनाली म्हसे, सरपंच कविता कर्णुक, उपसरपंच गौरव दिसले, तलाठी प्रतिक बापरडेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.काळे, डॉ. गायकवाड, चंद्रकांत फावडे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रसाद पाटील, पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम, अमोल फावडे, अनंता फावडे, राकेश कर्णुक, वरदविनायक पोल्ट्री मालक डॉ. बडगुजर आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थित होता.