आमदार संजय केळकर यांची मागणी
| मुंबई | प्रतिनिधी |
शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे आ. संजय केळकर यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, शिक्षक परिषदचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी राज्याचे ग्रामविकास सचिव यांची भेट घेतली असता, त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे दि.21 जून 23 च्या आदेशानुसार आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून आपलं म्हणणं सादर करावे, असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
दुर्गम क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सन 2022 या ऑनलाईन बदली प्रक्रियेत सहभागी होता आलं नाही. शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. शालेय शिक्षण विभागाने पारीत केलेल्या निर्णयात पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती पुर्वी जे शिक्षक दुर्गम क्षेत्रात कार्यरत कार्यरत आहेत आणि सन 2018 मध्ये ऑनलाईन बदली प्रक्रियेत रॅडम राऊंड मध्ये विस्थापित झालेले जे बदली साठी इच्छुक आहेत त्यांना मान. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी एक बदलीची संधी उपलब्ध करून दिली जावी. त्यांची समुपदेशनाव्दारे समायोजन करण्यात यावे. जिल्हास्तरावर शिक्षकाचे समुपदेशन घेऊन पदस्थापना करण्याबाबत कळविले आहे, याची कार्यवाही करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.






