अॅड. मानसी संतोष म्हात्रे, उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका (अलिबाग नगरपरिषद)
शेतकरी कामगार पक्षाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ नेते अॅड. गणपतराव देशमुख उर्फ आबा आज अनंतात विलीन झाले. जवळपास साठ वर्षांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातील नादब्रह्म शांत झाला! महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कामगार, ग्रामीण मजूर, दुर्बल स्त्रिया आणि तळागाळातील सर्व सामान्यांचा नेता अशी स्वर्गीय गणपतराव देशमुखांची ओळख होती.
सलग 11 वेळा एकपक्ष, एक विचार, एक तत्वप्रणाली घेऊन निवडून आलेले आबा हे महाराष्ट्रातले एकमेव व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या या अजोड, राजकीय पराक्रमाचा इतिहास महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. आबांनी गेली पाच दशके महाराष्ट्र विधिमंडळात अनेक ग्रामीण प्रश्नांवर गांभीर्याने व अभ्यासपूर्वक चर्चा घडवून आणली. त्यामुळे रोजगार हमी योजनांसारख्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या.
आबांचे अमोघ वक्तृत्व महाराष्ट्राने पाहिले, ऐकले व अभ्यासले. त्यातूनच अनेक नेते घडले. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना समाजसेवेचे बळ मिळाले. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांना आबांनी नेहमी नवसंजीवनी दिली आणि पक्षाची तत्व प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आबांच्या कार्यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांना पक्षवाढीकरिता आबांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व त्यामुळेच आजही शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानाने उभा आहे.
माझे आठवणीतले आबा मी पाहिले ते रायगड जिल्यातील उरण तालुक्यातील चिरनेर या गावी सन 1998-99 चे दरम्यान झालेल्या सभेमध्ये! सभा होती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खासदारकीचे निवडणूक प्राचारातील. संपूर्ण उरण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकाच वेळी चिरनेर या गावात गर्दी केली होती. त्यावेळी सभास्थानी प्रमुख वक्ते अॅड. दत्ता पाटील व अॅड. गणपतराव देशमुख होते. भर पावसात चिरनेर येथील मराठी शाळेच्या प्रांगणात सुमारे तीन तास हजार ते दोन हजार लोकांच्या उपस्थितीत लोकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या 2 वाघांना आक्रमकपणे अभ्यासपूर्ण विचारांची झेप घेताना पाहिले आणि त्याच सभेमध्ये खासदारकीच्या विजयाची अप्रत्यक्षपणे घोषणाच केली.
शेतकरी कामगार पक्षाने ती निवडणूक जिंकली. पुढे अनेक स्थित्यंतरे झाली पण आबांनी मांडलेलं तत्व आणि विचार मात्र बदलला नाही. पक्षबदलू आणि गटबदलू हे तर आता राजकारणाचे समीकरणच होऊ बसले आहे. अनेक नेत्यांना वैयक्तिक स्वार्थापोटी राजकीय तत्वांचा विसर पडला आहे. नीतिमत्तेची तर पावलोपावली पायमल्ली होत असताना आबांनी उभ्या महाराष्ट्रात एकपक्ष, एकविचार या एकनिष्ठतेचा आदर्श आपल्या पुढे ठेवला आहे.
आबांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. एक ज्येेष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. औरंगाबाद येथील शेतकरी कामगार पक्षाचे सन 2018 च्या वर्धापन दिनानिमित्त आबांचे विचार व्यासपीठावरून ऐकण्याची संधी मिळाली. त्यांची मार्गदर्शक तत्वे, जनसामान्यांप्रतीची तळमळ व पक्ष एकनिष्ठा बाळगणारा नेता आता होणे नाही, हेच त्रिकालबाधित सत्य आहे. आबा, आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या समर्पित जीवनास ह्या सर्वसामान्य कार्यकर्तीचा मनापासून लाल सलाम.