आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगडातील पथविक्रेत्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचा मोठा लाभ झाला असून,या योजनेची रायगडात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत बँकेकडून एकूण 1 हजार 769 लाभार्थ्यांना प्रथम कर्ज (रु.10 हजार) वितरीत करण्यात आले आहे व एकूण 117 लाभार्थ्यांना द्वितीय कर्ज (रु.20 हजार) वितरीत करण्यात आले आहे. नगरपालिका क्षेत्रात हे उद्दिष्ट 3 हजार 434 चे होते. त्यापैकी प्राप्त अर्जांची संख्या 2 हजार 437 होती व त्यापैकी मंजूर प्रकरणे 1 हजार 234 आहेत. या लाभार्थ्यांना एकूण 1कोटी 38 लक्ष 70 हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी योजना राबविण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
कोविड-19 (साथीचा रोग) सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदी मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम केला आहे. बहुदा ते कमी भांडवलावर पथविक्री करतात आणि जे काही भांडवल त्यांच्याकडे होते तेही या टाळेबंदीमध्ये शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे.