| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या सरकारमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरु असल्याची चर्चा आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जात आहे. असं असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भात एक विधान केलं. त्यांच्या विधानानंतर महायुतीत खळबळ उडाली. यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मंत्री संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत काही महत्त्व नाही, असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षाची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरवत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा आम्ही पक्षाचे आणि निर्णयाचे सर्व अधिकार फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिलेले आहेत. ते अधिकार दुसरे कोणालाही नाहीत. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट हे काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्त्व नाही. कारण, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, मला वाटतं त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) दोन पावलं मागे आलं पाहिजे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि त्यांचं (उद्धव ठाकरे) सुत जमेल असं वाटत नाही. मात्र, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आली तर माझ्या काही मर्यादा आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाऊ शकतो. मी त्यांना बोलू शकतो. पण एकनाथ शिंदे यांनी मला प्रतिप्रश्न केला तर मला काही बोलता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं होतं.
सेनेला झुकतं माप द्यावे कदम
महायुतीत अद्याप धुसफूस सुरुच आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीसुद्धा उडी घेतली आहे. रामदास कदम यांनी पालकमंत्रीपदावरूनही सुनील तटकरे यांना मन मोठं करण्याचा सल्ला दिला आहे. पालकमंत्रीपदावरून आपसात मतभेद नको. आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. सुनील तटकरे यांनी थोडसं मन मोठं केलं पाहिजे. त्यांची मुलगी पाच वर्ष पालकमंत्री होती. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे चार-पाच आमदार आहे, तिथे शिवसेनेला झुकतं माफ दिलं पाहिजे. भरत गोगावले हे सीनिअर आहेत. त्यांना पालकमंत्रीपद दिलं पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी निवडणुकीत योगेश कदम यांचं कामच केलं नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच याबाबतची लेखी तक्रार देणार असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.