नऊ जणांवर गुन्हा दाखल
। गुहागर । प्रतिनिधी ।
लोणावळ्यात फिरायला गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील एका तरुणाचा गाडी वळवण्याच्या वादातून स्थानिक तरुणांनी खून केला. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास घडला. तसेच, या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कमलेश तानाजी धोपावकर (वय 45, रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुहागरमधून कमलेश धोपावकर हे लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शनासाठी गेले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी वाद घातला. या वादातून त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. याच मारामारीतून कमलेश धोपावकर यांचा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अन्य आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.