7 कोटी 61 लाखांचा संभाव्य आराखडा तयार; 1 हजार 328 गावे, वाड्यांचा समावेश
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी 7 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात 1 हजार 328 गावे व वाड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
कृती आराखडा दृष्टिक्षेप
उपाययोजना – गावे – वाड्या – अपेक्षित खर्च
विहिरी खोल करणे गाळ काढणे – 31 – 44 – 80 लाख 7 हजार
टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा – 258 – 688 – 3 कोटी 44 लाख 15 हजार
नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती – 22 – 1 – 1 कोटी 19 लाख 85 हजार
नविन विंधन – 70 – 137 – 1 कोटी 90 लाख 2 हजार
विंधन विहिरी दुरुस्ती – 34 – 43 – 27 लाख 49 हजार
जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करून पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी.
डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड