| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मोरबे जलवाहिनी ही पनवेल तालुक्याच्या हद्दीमधून येत असताना देवद-विचुंबे या ठिकाणी अनधिकृतपणे नळ जोडणी करून मोठ्या प्रमाणामध्ये पाणीचोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप गवस यांनी महानगरपालिकेत याबाबत लक्षवेधी मांडली असता पोलिसात तक्रार करण्यात आली होती.
मोरबे धरणाची जलवाहिनी या ग्रामपंचायती हद्दीतून जात असल्याने 2007 मध्ये फक्त 700 युनिट पाणी देण्याची मुभा देण्यात आले होती. वाढत्या मागणीमुळे 2014 मध्ये ती 1400 से युनिटपर्यंत वाढवली. मात्र, स्थानिक पातळीवरील वाढते शहरीकरण आणि राजकीय दबाव यांच्याकडून अनधिकृत जोडण्या करून दररोज एक लाख युनिट पाणी उपसले जात असल्याचा आरोप होत असून, याचा फटका नवी मुंबई येथील रहिवाशांना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही स्थितीत सुधारणा न झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक प्रदीप गवस यांनी दि. 16 मार्च 2026 रोजी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याला पत्र पाठवून अनधिकृत जलवाहिन्या तोडण्यासाठी बंदोबस्ताचे मागणी केली होती.
याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी कारवाईसाठी गेले असता तेथील स्थानिक नागरिकांनी सदर अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्यास विरोध केल्याने या दिवशी कारवाई करता आली नाही.
या अनधिकृत नळ जोडण्यासाठी नवे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीकरिता 80 लाख 12 हजार 560 रुपये दंडाची रक्कम आकारली होती; परंतु अद्याप ती दंडाची रक्कम भरण्यात आलेली नाही.







