एक तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील मजरे जांभुळ पाडा येथील गावाच्या शेजारी शेतात असलेल्या एका विहिरीत गुरे चारण्यासाठी गेलेला तरुण हातपाय धुण्यासाठी विहिरीवर गेला, यावेळी तोल गेल्याने हा तरुण ३० ते ३५ फूट खोल विहिरीत पडला व खोल तळाशी गेला. केशव रवींद्र मालुसरे (वय १८) असे विहिरीत बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनेची खबर मिळताच पाली पोलीस व कोलाड रिव्हर राफ्टिंग चे प्रमुख महेश सानप व त्यांचे सहकारी हरेश सानप, अमित जाधव, रोशन सानप ही टीम तसेच अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणारी गुरुनाथ साठीलकर व सहकारी विजय भोसले, अमोल कदम, निलेश कुदळे, अंकुश मोरे, भक्ती साठेलकर, विशाल चव्हाण विवेक रावळ ही टीम देखील घटनास्थळी पोहचली. महेश सानप व टिमने मार्कम कॅमेरा व अत्याधुनिक साधनसामग्री चा वापर करून बुडालेल्या तरुणाला काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

विहिरीचा घेरा लहान असल्याने तब्बल 1 तासाने अथक परिश्रमानंतर सदर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक असणारे जनरेटर व विजव्यवस्था संतोष यादव, राजेश किलंजे यांनी केली. या ठिकाणी पाली पोलिस उपनिरीक्षक श्री सरगर, पोलिस नाईक प्रशांत भोईर, पोलिस हवालदार राजेंद्र राठोड, सहायक फौजदार घाडगे आदि पोलिस टीम देखील उपस्थित होती. याकामी चिवे सरपंच अनिता रोहिदास साजेकर व मजरे जांभुळपाडा ग्रामस्त व सैम मित्र मंड, सामाजिक कार्यकर्त्यां लताताई कळंबे आदिंचे सहकार्य लाभले. यावेळी मोठी गर्दी जमली होती. या घटनेनंतर पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी धोकादायक विहिरी व त्यावर उपाययोजना करण्या संदर्भात ग्रामपंचायतीला आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान या अपघाती घटने नंतर सुधागडातील अन्य उघड़या व धोकादायक विहीरिंचा गंभीर प्रश्न समोर आला. भविष्यात विहिरीत पडून होणाऱ्या अपघाती घटना टाळण्यासाठी व सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली, यावर चिवे सरपंच अनिता रोहिदास साजेकर यांनी मजरे जांभुळपाडा येथील शेतात उघड्यावर असलेल्या विहिरीला संरक्षण कवच बसविणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.