। अंबाला । वृत्तसंस्था ।
हरयाणातील अंबाला जिल्ह्यात 3 टूरिस्ट बसची धडक झाली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. तिन्ही बस दिल्लीच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. चंदिगढ-दिल्ली महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वैष्णवदेवी यात्रेसाठी गेले होते. परतीच्या मार्गावर धुक्यामुळे बसची धडक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये छत्तीसगढच्या मीना देवी, रोहित यांचा तर झारखंडच्या राहुल आणि उत्तर प्रदेशातील प्रदीप नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.