। मुंबई । प्रतिनिधी ।
दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्मरण करत केंद्रातील भाजपवर निशाणा साधला आहे. याबाब त्यांनी सोशल मीडियावर एक खरमरीत पोस्ट लिहीली आहे.
2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारला शिफारस पाठवण्यात आली होती. परंतु, अद्यापही केंद्र सरकारकडे ही शिफारस मंजुरीसाठी पडूनच आहे. या गोष्टीला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तसेच, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी पत्र लिहिली असूनही, ती शिफारस प्रलंबित असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच, नागरी उड्डाण मंत्र्यांनी आजच्या खास प्रसंगी हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे. त्यासोबतच, छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे ठेवण्याचा प्रस्ताव 2020 पासून केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे.