। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील तुटवली या दरडग्रस्त गावामध्ये रायगड कृषी विकास संघटना व ग्रामस्थ मंडळ तुटवली यांचे संयुक्त विद्यमाने कृषी विभागाच्या सहकार्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बांबू लागवड शुभारंभ व कृषीदिना निमित्ताने पंचक्रोशीतील नाविन्यपूर्ण उपक्रम करणार्या शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी पैठणचे मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहाय्यक मनोज जाधव आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महेश मोरे यांनी भुषविले.
तुटवली गाव अत्यंत दुर्गम भागात डोंगरालगत वसले असून 2005 मध्ये या गावात मोठया प्रमाणात दरडी कोसळून हे गांव दरवर्षी दरडग्रस्त गाव म्हणून आपत्तीनिवारण कक्षाकडून जाहिर केले जात असते. या गावातील लोकांना स्थलांतर करणे शक्य नसल्याने एखादी दुर्घटना घडू नये म्हणून गावाच्या वरच्या बाजूला रायगड शेतकरी विकास व तुटवली ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने व कृषी विभागाच्या सहकार्याने गावाच्या उंचावरील भागात 5 एकर क्षेत्रात 800 बांबू लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी बांबू लागवड विषयी माहिती दिली. दरड व धुप प्रतिबंधक तसेच व्यापारी दृष्टिकोनातून बांबू लागवडीचे महत्व उपस्थितीला पटवून दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मानवेल जातीचे एक वर्षाचे रोप उपलब्ध करून दिली आहेत. कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी बांबू लागवड कशी करावी व त्याची जोपासना व खत व्यवस्थापन बाबत माहिती दिली.
रायगड कृषी विकास संघटनेचे अध्यक्ष महेश मोरे यांनी पोलादपूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता शासनाची सहकार्याने गावोगावी डोंगराकडील भागात बांबू लागवड करून होणार्या दुर्घटनेपासून आपणहूनच नैसर्गिकरित्या मात करणे काळाची गरज असल्याचे सांगून संघटनेच्यावतीने शेतीविषयक साहित्याचे मोफत वाटप केले. यावेळी तुटवली गावातील तरुणांनी,ग्रामस्थांनी व कृषी विभागांने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुटवली येथील रामचंद्र मोरे, लक्ष्मण सकपाळ, रमेश दरेकर, पांडुरंग दरेकर, विष्णू सकपाळ, सुंदर कदम, कृष्णा सकपाळ, सुरेश मोरे, कमलेश सकपाळ, अथर्व मोरे, संजय मोरे,राजु मोरे, चंद्रकांत घावरे, पांडुरंग मोरे, गणेश मोरे, प्रदीप पालांडे, सतीश मोरे, बबन मोरे, प्रवीण मोरे, आनंद सकपाळ, रविकांत सुर्वे, विलास जाधव, राहुल मोरे, सतीश मिस्त्री, प्रभाकर जाधव, पांडुरंग बाबाराम मोरे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.