। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील अंतर्गत गावांना समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. खारफुटीच्या जंगलासह मुबलक प्रमाणात जैवविविधता लाभली आहे. मात्र, गावाबरोबर रस्त्यालगत असलेल्या खाडीकिनार्यावर गोदाम मालक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात डेब्रिज, मुरुम, मातीचा भराव टाकून खाडी बुजवून पाणथळ क्षेत्र व खारफुटीची वने नष्ट करत आहेत. त्यामुळे खाडीकिनार्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात येऊन गाव परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शासनाने खारफुटी (कांदळवन) वनविभागाकडे हस्तांतरित केले आहे. मात्र, उरण तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी वर्गाने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी जास्त लक्ष देणे पसंत केल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत तालुक्यातील चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधने, पागोटे, नवघर, खोपटा, धुतूम, सोनारी, करळ, जासई, बोकडविरा, नवीन शेवा, चाणजे, सोनारी, जसखार, नवघर, पाणजे सह इतर गावालगतच्या खाडीकिनार्यावरील खारफुटीची कत्तल करून त्याठिकाणी डेब्रिज, माती व मुरुमचा भराव केला जात आहे. तसेच, फ्लेमिंगो सह इतर पक्षांची पाणथळ क्षेत्र हि नष्ट केली जात आहेत. यासंदर्भात दक्ष नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी वन विभाग व इतर शासकीय कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र, या तक्रारींकडे शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खाडीकिनार्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात आली असून येणार्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.