| माणगाव | प्रतिनिधी |
रायगडात हळूहळू थंडीचा जोर वाढत चालला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्याचे दिसत आहे. पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. सकाळी सकाळी पडणारे दाट धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपर्यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिसू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गारवा वाढत चालल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या दिसू लागल्या आहेत. गारवा वाढत जाईल तसे शेकोट्याभोवती गर्दी वाढत जाणार आहे. अडगळीतील लाकडे, पाळा पाचोळा, टाकाऊ कागद, पुठ्ठे इत्यादींचा वापर करून या शेकोट्या केल्या जातात. अनेक ठिकाणी हिवाळ्यासाठी खास मोठे लाकूड, ओंडके शेकोटी करिता ठेवले जाते. दररोज ते पेटवून शेकोटी केली आहे. लहान मुले ,स्त्री-पुरुष ,वृद्ध, तरुण सर्वजण या शेकोट्यांचा आनंद घेतात. सार्वजनिक ठिकाणी, चौक या ठिकाणी तर आवर्जून शेकोट्या केल्या जातात.
सकाळी साधारणता साडेसात, आठ वाजेपर्यंत अगदी सूर्याची किरणे जाणवेपर्यंत शेकोटीचा आनंद घेतला जातो. तसेच रात्रीही जेवणानंतर अनेक ठिकाणी शेकोट्यानभोवती उबदारपणा घेतला जाऊ लागला आहे. हिवाळा आणि शेकोटीचा हा कार्यक्रम सर्वांच्या जीवनातील आनंदाचा भाग असून गाणी, गप्पा, विनोद आणि मनोरंजनाची वेगळी अशी पर्वणी या निमित्ताने सर्वांना मिळते आहे .