महापुराने डोंगराची माती शेतात घुसल्याने भातशेती उध्वस्त; शेतात भाताच्या रोपाऐवजी माती अन् दगड
। नेरळ । प्रतिनिधी ।
अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. लहान डोंगराखाली आणि ओढे-नाले यांच्या आजूबाजूला असलेल्या भातशेतीत महापूराचे पाणी घुसले. भाताचे रोपे लावलेल्या भातशेतात मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती वाहून आल्याने शेतीचे नुकसान झाले असून तालुक्यातील किमान 3 हजार हेक्टर जमिनीवरील भातपीक मातीत गाडले गेले.
कर्जत तालुक्यात सतत तीन दिवस कोसळलेल्या धुवाधार पावसाने ओढे आणि नाले तसेच नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नद्या आणि नाल्यांमधून पाणी बाहेर पडून आजूबाजूच्या शेतात घुसले होते. त्यात कर्जत-भिवपुरी जवळील डोंगराळ भागात अनेक दगडखाणी आहेत. दगड फोडून खडी काढताना वरच्या मातीचे ढिगारे बाजूला काढून ठेवले जातात. ढिगारेच्या ढिगारे मुसळधार पावसामुळे कर्जत -कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरून पलीकडील कोषाणे, उमरोली, सावरगाव, वांजळे या गावानजीक भात शेतीमध्ये आले आणि भातपीके उध्वस्त झाली. खडी मशीनवाल्यांनी ढिगारे करून ठेवलेली माती अतिवृष्टीमुळे रस्ता उलटून भातशेतीत आले आणि भातशेतीचे खूप नुकसान झाले असा आरोप शेतकरी करीत आहेत.
उल्हास नदीला आलेल्या महापूराचे पाणी नेवाळी, तळवडे, कोल्हारे, धामोते, मालेगाव, दहिवली, बिरदोले, शेलू या भागातील भातशेतीतून मिळेल तेथून वाट काढत पुढे जात होते. या भागातील पिकावर दगडांचा आणि मातीचा खच पडला, तर दुर्गम भागात असलेल्या ओलमण, नांदगाव, खांडस, पाषाणे, कळंब, वारे, पोशीर, दहिवली, माणगाव, उमरोली, किरवली, वाकस, वारे, कशेळे, बोरिवली, मानिवली, पाथरज, मोग्रज, शेलू या ग्रामपंचायतीमधील हजारो हेक्टर जमिनीमध्ये दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले यांचे पाणी घुसले होते. त्यात माती आणि दगड येऊन भाताच्या शेतात थांबले आणि भातशेती दिसेनाशी झाली.
हे नुकसान केवळ भाताच्या पिकाचे नाही तर आम्हाला आता भाताच्या शेतात येऊन थांबलेल्या दगड आणि माती यांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. या नुकसानीबद्दल शासन कोणताही विचार करीत नाही. आमच्या अनेकांच्या घरात महापूरचे पाणी घुसले आणि सर्व साहित्य भिजले आहे. याची भरपाई न भरून येणारी आहे.
भगवान जामघरे-शेतकरी, बिरदोले
आमचे शेतात आलेली दगड आणि माती यामुळे माळरानावर असलेली अनेक शेत नाहीशी झाली आहेत.पुराचे पाणी घुसलेल्या प्रत्येक शेताचे बांध यांची मोडतोड होऊन ते वाहून गेले आहेत. बांधबंदिस्तीसाठी शासन काही मदत करणार आहे काय?
प्रकाश केवारी-शेतकरी,ताडवाडी
प्रत्येक वर्षी पावसात थोडी माती येते परंतु गुरुवारचा पाऊस भयानक असल्याने मोठ्या प्रमाणात माती आली आणि आमची भात शेती जमीनदोस्त झाली.
हरीचंद्र ठोंबरे-शेतकरी, कोषाणे
आम्ही नुकसानीचे पंचनामे करीत आहोत, मात्र शासनाचे नुकसान भरपाईचे निर्देश प्राप्त झाले नसल्याने पंचनामे त्या स्वरूपात केले असले तरी नुकसानभरपाई झालेल्या कोणत्या नुकसानीची मिळणार हे आम्हाला सध्या शेतकर्यांना सांगता येत नाही.
शीतल शेवाळे-तालुका कृषी अधिकारी