मुरूड तालुक्यातील 12 गावांतील शेतीला पाणीपुरवठा नाही
मुरूड जंजिरा | वार्ताहर |
29 कोटी रुपये खर्चून मुरूड तालुक्यातील खारआंबोली परिसरात लघुपाटबंधारे विभागांतर्गत शेतीसाठी आंबोली हे 518 मीटर लांबी आणि 32.9 मीटर उंचीचे मातीचे सिंचन धरण दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. मात्र, प्रचंड पाणीसाठा उपलब्ध असणार्या या धरणातून काढण्यात येणारे उजवा व डावा तीर असे दोन कालवे अद्याप काढण्यात आले नसल्याने आजूबाजूच्या 12 गावांतील शेतकर्यांना दुबार शेती अथवा कोणतेही पूरक पीक काढता येत नाही. त्यामुळे धरण उशाशी आणि शेतकरी उपाशी अशी शोचनीय परिस्थिती झाल्याची माहिती वाणदे या गावचे सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि वाणदे हायस्कूलचे स्थानिक समितीचे चेअरमन तुकाराम दामोदर पाटील यांनी दिली.
शेतीला पाणी देखील पाणीपुरवठा होईल या अपेक्षेने शिघ्रे, वाणदे, जोसरांजन, उंडरगाव, आंबोली, तेलवडे, वावडुंगी, सायगाव बौद्धवाडी, नागशेत, नवी वाडी आदी परिसरातील 12 गावच्या शेतकर्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाला दिल्या आहेत; मात्र अद्याप कालवे काढण्यात आलेले नसल्याने शेतकर्यांचे खूप नुकसान होत असून, एक प्रकारे शेतकर्यांची घोर फसवणूक होत असल्याची भावना पंचक्रोशी आगरी समाज तप्पा सल्लागार तुकाराम पाटील यांनी व्यक्त केली. आंबोली ते खोकरी. आंबोली ते तेलवडे असे दोन कालवे असून याबाबत शासन स्थरावर कोणतीच अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भात, भाजीपाला, असे उत्पन्न देणारे कोणतेच पीक घेता येत नाही. त्यामुळे 12 गावांतील शेतकरी वर्ग बेजार झाला आहे. या धरणातून फक्त मुरूड शहराला पिण्याच्या पाणीपुरवठा होतोय, अशी माहिती तुकाराम पाटील यांनी दिली. आंबोली धरण असूनही आजूबाजूच्या अगदी जवळच्या गावांतून पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत.
कालवे प्रवाहित झाल्यास…
आंबोली धरणातून मुरूड शहरास 0.849 दश लक्ष घनमीटर, तर लगतच्या गावांसाठी 616 हेक्टर मध्ये 9.11दश लक्षघनमीटर पाणी सिंचन पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहेत. जून 2015 पासून कालव्याबाबतचे काम निधी नसल्याने बंद आहे. अधिक माहिती घेता टेंडर पातळीवरच हे काम रेंगाळून बंद पडले आहे. दोन्ही कालवे प्रवाहित झाल्यास सुमारे 650 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन परिसर सुजलाम् सुफलाम् होऊ शकतो, यात शंकाच नाही.