विभागीय आयुक्तांना अशुद्ध पाणी सादर
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीं व इतर गावकर्यांनी मंगळवारी शुद्ध पाण्यासाठी कोकण भवनवर हंडा मोर्चा काढून आयुक्तांना अशुद्ध पाणी सादर केले.
ग्रामस्थांची फसवणूक करून त्यांना पाताळगंगा नदीचे प्रदूषित पाणी पाजून जीवाशी खेळणार्या पनवेल पं.स.चे अकार्यक्षम गटविकास अधिकारी संजय भोये व इतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. एमआयडीसी कडून नवीन वॉटर टॅपिंग घेऊन मंजूर जलजीवन मिशन योजना तात्काळ कार्यान्वित करून गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी व इतर ग्रामस्थांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. ह्या मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी व आदिवासी ग्रामस्थ लाडविली यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा कोकण आयुक्त कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. सुमारे चारशे ग्रामस्थ महिला व आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
दरम्यान पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर मोर्चेकरांचे शिष्टमंडळ कोकण आयुक्त कार्यालयात चर्चेसाठी नेण्यात आल. यावेळी शेकडो संतप्त मोर्चेकरांनी शासनासह निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणा दिल्या. उपायुक्त गिरीश भालेराव व उपायुक्त (आस्थापना) श्री पाटील यांना ग्रामस्थ पीत असलेले दूषित पाणी देण्यात आले व पुढील पंधरा दिवसात आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आझाद मैदानात आमरण उपोषणाचा इशारा मोर्चेकर्यांनी दिला.